मुंबई_अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

पालघर! मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेच्या २४ तासाच्या आतच दुसरा मोठा अपघात झाला आहे.
टेम्पो आणि एर्टिगा गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात एर्टिगा गाडीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर टेम्पो चालक जखमी झाला आहे. भरधाव कार डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेंम्पोवर धडकली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २४ तासांच्या आतच मोठा अपघात झाल्याने याठिकाणी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या भीषण अपघातामध्ये दोन जणांच्या मृत्यू झाल्यानंतर या अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. यामध्ये आर्टिका कारचा चुराडा झाला आहे. फोटोमध्ये वाहनांची अवस्था पाहून हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना येऊ शकते.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. या मार्गावरील 82 ब्लॅकस्पॉटकडे (अपघातप्रवण क्षेत्रे) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदारांचे दुर्लक्ष झाल्याने हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघातही याच महामार्गावर झाला होता. या गाडीमधील दोन्ही मृतांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. गाडी अतिशय वेगात होती, त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असं एका पोलीस अधिकाऱ्याने प्राथमिक तपासानंतर सांगितलं होतं.