उज्वल निकम सर तुमचे जनतेच्या न्यायालयात स्वागत_ॳॅड,असिम सरोदे
या न्यायालयात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो,इथे मनं जिंकावी लागतात व लोकांची त्वरित येणारी प्रतिक्रिया ‘जेव्हढे विचारले तेवढेच बोला’ असे म्हणून थांबविणे लोकांच्या न्यायालयात चालत नाही.
आपण अनेक खटल्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यात यश मिळवले. जरी कुणी अजून तशी माहिती दिलेली नाही तरी पण काहीही फी न घेता गरजुंना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा तुम्ही काम केले असेल असे समजू.
सर तुम्हाला माहिती आहे कि आता लोकांशी संवाद साधतांना गोलमोल,गुळमुळीत बोलून चालणार नाही. लोकांनी मोदीजींचा खोटेपणा आता कुठे ओळखला आणि तुम्ही त्यांच्यात सामील झालात.
सर, अनेकदा तुम्ही केसची कागदपत्रे,चार्जशीट बघून हरणारी केस घेणे नाकारले आहे. मोदींचा नाकर्तेपणा, धर्मांधता, महागाई वाढवणे,भ्रष्टाचारी असणे, लोकशाही विरोधी असणे आता लोकांनी स्पष्टपणे ओळखले आहे व यावेळी मोदींना हरवायचे असा चंग लोकांनी बांधला आहे तेव्हा ही हरणारी केस आपण का घेतली याचे अनेकांना आश्चर्य वाटते आहे.
मोदींनी लोकशाही यंत्रणांचा भरमसाठ गैरवापर केला. अगदी पोलीसच नाही तर न्यायव्यस्थेचा गैरवापर केला पण तुम्ही त्यावर काहीच बोलले नाही, तरीही आम्ही तुम्हाला नेहमीच विशेष समजत आलो.
असे असूनही तुम्ही नक्की हा लोकशाही प्रक्रियेतून जाण्याचा अनुभव घ्या आणि जेव्हा लोकांमधील सत्याचा दाह तुम्हाला जाणवेल त्यातून कदाचित स्वतःभोवती मोठेपणाचे स्वतःच तयार केलेले काल्पनिक मुखवटे गळून पडलेला एक खरा वकील-माणूस आम्हाला भेटेल.
सर, राजकारणात सत्य आणि सामाजिकता प्रस्थापित करण्यासाठी जाणून बुजून काम करणाऱ्यांची गरज आहे. कायदेशिरतेवर आधारित समाज आणि संविधानिक नैतिकता असणारे राजकारण याबाबत अत्यंत मनापासून व प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
आम्ही निर्भय बनो द्वारे नक्कीच उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात जाहीर सभा घेऊ. आपल्या आपल्या भूमिका आपण प्रामाणिकपणे आणि कसोशीने करू. सर, ये पब्लिक है ये सब जानती है याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.
असो … संवाद सुरूच राहील.
✍🏻
Adv. Asim Sarode.